जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी लवकरच जन आंदोलनाला सुरुवात.- सतिश पवार

बुलढाणा (प्रतिनिधी) दिनांक १९: बुलढाणा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असून भौगोलिक दृष्ट्या घाटाखालील व घाटावरचा अशा दोन भागांमध्ये विभागलेला आहे. औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा मागासलेला असून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय जिल्ह्यातील लोकांना आहे. बुलढाणा येथे नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालयाची स्थापना झाल्यास गरिब व वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. त्यामुळे शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर बुलढाणा येथे नवोदय विद्यालय व केंद्रीय विद्यालयाची उभारणी करावी. तसेच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दिवसेंदिवस अतिशय दयनीय होत चाललेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागासह आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जातीसमूहातील विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचे प्रभावी साधन आहे. या शाळा बंद पडल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी तथा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जातीसमूहातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येईल. भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा मूलभूत अधिकार असून वय वर्ष १४पर्यंत प्रत्येकाला तो सक्तीने व मोफत मिळायला हवा. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्यास या मूलभूत अधिकाराचे हनन झाल्याशिवाय राहणार नाही. अगोदरच राज्यामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. असे असताना शाळा बंद पडल्यास तिथे कार्यरत असलेल्या शिक्षकांचा देखील समायोजन संदर्भात मोठा प्रश्न निर्माण होईल. भविष्यातील होणारे नुकसान व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळा वाचण्यासाठी लवकरच भीम आर्मी द्वारा व्यापक स्तरावर जन आंदोलन उभारणार असल्याचे सतीश पवार यांनी सांगितले.


