सतत पतीला “तु काहीच कामाचा नाही”, असे म्हणून अपमान करत असल्याने पतीने रागाच्या भरात झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून तिची निघृन हत्या केल्याची थरारक घटना जळगाव जामोद तालुक्यातील उटी बु. येथे 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आली.

जळगाव जामोद( प्रतिनिधी )तालुक्यातील उटी बु. गावात मध्यरात्री हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सततच्या वादातून उद्भवलेल्या रागाच्या भरात पतीने झोपलेल्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक महिलेचे नाव लक्ष्मी पवन धुंदाळे (24) असून आरोपी तिचा पतीचे नाव पवन गजानन धुंदाळे (28)आहे. पीडितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा हे रात्री 1 वाजता धाव घेत पोलीस पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले. अशी माहिती दिली. तत्काळ पोलीस पाटील घटनास्थळी पोहोचले असता लक्ष्मी ही खोलीतील बिछान्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत आढळली. मानेच्या मागील बाजूस खोल जखम होती व बिछाना पूर्ण रक्ताने माखलेला होता. घटनास्थळी उपस्थित आरोपी पवन याने धक्कादायक कबुली दिली. लक्ष्मी मला नेहमी तू काही कामाचा नाहीस, कुठे जाऊन मर असं बोलून अपमान करायची. काल रात्रीही तिने शिविगाळ केली. रागाच्या भरात मी तिला झोप लागल्यानंतर कुऱ्हाडीने वार केला, असे पवनने पोलीस पाटीलांना सांगितले. माहिती मिळताच पोलीस, रूग्णवाहिका आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी तपासून लक्ष्मीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. दांपत्याला सात महिन्यांची श्रेया नावाची मुलगी आहे. या अमानुष कृत्याने गावात शोककळा पसरली असून पवन धुंदाळे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.


