mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

Discrimination does not end even if income increases”: When will justice be served to bank manager Vijay Gajbhiyen, who has been on hunger strike for 248 days? :“उत्पन्न वाढले तरी भेदभाव संपत नाही”: 248 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या बँक मॅनेजर विजय गजभियेंना न्याय कधी?

बुलढाणा (प्रतिनिधी): दि. 8 जून 2026 “उत्पन्न वाढलं तरी भेदभाव संपत नाही…” पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांचे हे वाक्य आजही किती खरे आहे, याची प्रचिती विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे मॅनेजर विजय गजभिये यांच्या संघर्षातून येत आहे.  

प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि समाजासाठी झटणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विजय गजभिये गेल्या 248 दिवसांपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र प्रशासन आणि समाजाची या लढ्याकडे असलेली उदासीनता वेदनादायी आहे.  

कोण आहेत विजय गजभिये? 

विजय गजभिये हे केवळ बँकेचे अधिकारी नाहीत, तर एक संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे.  दर शनिवार-रविवार ते स्थानिक बुद्ध विहारात जाऊन गोरगरीब मुलांना मोफत इंग्रजी शिकवतात.   “प्रत्येक बुद्ध विहारात ग्रंथालय असले पाहिजे” या विचाराने त्यांनी स्वतः शेकडो पुस्तके दान केली आहेत आणि इतरांनाही प्रेरित केले आहे.   स्वतःच्या पगारातील हिस्सा बाजूला काढून त्यांनी अनेक बुद्ध विहारांना खुर्च्या, साहित्य दान केले आहे.  

आयुष्यभर इतरांना उभे करण्याचा, गरीब मुलांच्या हातात पुस्तक देण्याचा, बुद्ध विहारात ज्ञानाचा दिवा पेटवण्याचा प्रयत्न करणारा हा माणूस आज स्वतः न्यायासाठी रस्त्यावर बसला आहे.  

248 दिवसांचा संघर्ष आणि व्यवस्थेचे मौन  

मिळालेल्या माहितीनुसार, विजय गजभिये यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक आमदार, खासदारांचे उंबरठे झिजवले. तरीही न्याय मिळाला नाही, म्हणून नाईलाजाने त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले. आज 248 दिवस उलटूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.  

“संविधान समानतेची भाषा शिकवतं, बुद्ध मानवतेची शिकवण देतात… मग अशा माणसाच्या वेदनेकडे दुर्लक्ष का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.  

सामाजिक संघटनांचे मौन चिंताजनक

एका प्रामाणिक अधिकाऱ्याला 248 दिवस उपोषण करावे लागते आणि सामाजिक संघटना, अन्यायाविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते शांत राहतात, ही बाब गंभीर आहे. “आज विजय गजभिये यांना फक्त न्यायाची गरज नाही, तर समाजाने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. कारण उद्या हा संघर्ष कोणाचाही असू शकतो,” अशी भावना व्यक्त होत आहे.  

डॉ. सुखदेव थोरात म्हणतात त्याप्रमाणे, प्रश्न फक्त पैशाचा नाही. प्रश्न मानसिकतेचा, व्यवस्थेतील असमानतेचा आणि माणसाला माणूस म्हणून न स्वीकारणाऱ्या विचारांचा आहे. ज्याने आयुष्यभर समाजासाठी दिले, त्यालाच आज न्यायासाठी झगडावे लागत असेल, तर ही समाजाच्या संवेदनशीलतेची हार आहे.  

न्यायाच्या प्रतीक्षेत : न्यायासाठी लढणाऱ्या विजय गजभिये यांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.  

चांगल्या माणसांच्या पाठीशी आपण उभं राहणार तरी कधी?” हा प्रश्न आज प्रत्येक संवेदनशील नागरिकाला स्वतःला विचारावा लागेल.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top