राजकिय दबावापोटी धाड पोलीसांची गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ
पिडीत महिलेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

बुलढाणा/प्रतिनिधी
रूईखेड मायंबा येथील सरपंच पतीने जातीवाचक शिवीगाळ करून एका विवाहितेचा विनयभंग केला आहे. याविरोधात धाड पोलीसांनी संबंधितांविरूध्द गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली असून या विरोधात सदर महिला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, धाड पोलीस ठाणे राजकीय दबावाखाली काम करत असून विनयभंग व अॅट्रॉसिटी प्रकरणातील गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप इब्राहीमपुर (ता. भोकरदन, जि. जालना) येथील उमा जगदीश गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. उमा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे माहेर मौजे रुईखेड मायंबा येथे असून त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने त्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी काही समाजकंटकांनी जातीय तेढीतून त्यांच्या आई-वडिल व भावाला मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले. ही मारहाण थांबवण्यासाठी त्या व त्यांचे पती जगदीश गायकवाड मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, रवि गिरी यांचा भाचा विशाल याने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच ‘मांगाची पोडची तुझ काय आहे इथे, तू निघ येथून’ असे म्हणत तिच्या अंगावर हात टाकून साडीचा पदर ओढत लज्जास्पद कृत्य केल्याचा व विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच माहेरी आल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर त्यांनी ११२ क्रमांकावर कॉल केला असता पोलिसांनी ‘गाडी उपलब्ध नाही, तुम्हीच पोलीस ठाण्यात या’ असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्या धाड पोलीस ठाण्यात गेल्या; मात्र रात्री १ वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणातील आरोपींमध्ये सरपंच पती अनिल शामराव फेपाळे, रवि प्रकाश गिरी आदींचा समावेश असून संबंधित पोलीस निरीक्षकांचे आरोपींसोबत चांगले संबंध असल्याने तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षक व आरोपींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उमा गायकवाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी ४ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे कुटुंबासह धाड पोलीस ठाण्याविरोधात उपोषणास बसल्या असून उपोषणादरम्यान घडणार्या सर्व घटनांस शासन, प्रशासन व संबंधित आरोपी जबाबदार राहतील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
विशेष म्हणजे ४ मार्च चे रात्री १२.३० चे दरम्यान उपोषणस्थळी साप निघाला असल्याची माहिती त्यांनी दिली असून सदर ठिकाणी असलेल्या होमगार्ड यांनी प्रत्यक्ष साप पाहिला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.


