प्रशासनाला कल्पना देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष

मेहकर/ प्रतिनिधी
मेहकर शहरातील लाहोटी कॉम्प्लेक्स परिसरात आगीच्या मोहोळामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून सायंकाळच्या वेळेत ये-जा करणार्या अनेकांना मधमाशांच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग्यामोहळाच्या संभाव्य हल्ल्याची कल्पना स्थानिक प्रसारमाध्यमाने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनाला दिली होती. परंतु संबंधित प्रशासनाकडे याबाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आज नागरिकांना सदर आग्यामोहळाचा प्रकोप सहन करावा लागला. विशेष म्हणजे आज १७ मार्च रोजी पुन्हा एकदा या मोहोळामुळे काही नागरिकांना मधमाशांनी चावल्याची घटना घडली. एका व्यक्तीला तर मधमाशांच्या हल्ल्यामुळे घाबरून अक्षरशः कपडे काढून रस्त्यावरून पळत जावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आग्यामोहळाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी लाहोटी कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. आपले संरक्षण करण्यासाठी नागरिक अक्षरशः टॉयलेटमध्ये दडून बसल्याची माहितीही नागरिकांकडून प्राप्त झाली आहे. नगरपालिका प्रशासन व वनविभागाने आग्यामोहळाकडे दुर्लक्ष केल्यानेच नागरिकांवर जीवघेणा प्रसंग आला होता अशा संतप्त प्रतिक्रिया मेहकरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. आग्यामोहळाबद्दल प्रशासन अनभिज्ञ असून संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान,येथील काही नागरिकांनी वनविभागाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत असल्याची चर्चाही होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. लाहोटी कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापार्यांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. मधमाशांच्या भीतीमुळे अनेकांना दुकाने बंद ठेवावी लागत असून व्यवसायावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली असून, संबंधित मोहोळ सुरक्षितपणे हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.


