डोंगरखंडाला ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

डोंगर खंडाळा / प्रतिनिधी
डोंगर खंडाळा येथील बस स्टँड परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बस स्थानक परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छता यामुळे प्रवासी, वाहनधारक तसेच शेजारील झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे डोंगर खंडाळा ग्रामपंचायतीकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बस स्टँड परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. मात्र परिसरात नियमित स्वच्छता केली जात नसल्याने कचऱ्याचे ढिग साचलेले दिसून येतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांना बसची वाट पाहताना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांनाही कचऱ्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे बस स्टँड परिसरात जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम होत आहे. अस्वच्छतेमुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही काळापूर्वी गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा कुंड्या लावण्यात आल्याचे सांगितले गेले होते. मात्र सध्या त्या कुंड्या परिसरात दिसून येत नाहीत. त्या नेमक्या कुठे गेल्या, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. कचरा कुंड्या लावल्याच्या नावाखाली निधी काढण्यात आला असून प्रत्यक्षात त्या गायब झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने बस स्टँड परिसराची स्वच्छता करून कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था करावी, तसेच गायब झालेल्या कचरा कुंड्यांबाबत चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


